१
तसं काही न ठरवता सुद्धा आमच्या हिमाचलच्या ट्रीपमध्ये वेगवेगळ्या धर्मांची धार्मिक स्थळं बघण्याचा योग आला. हिंदूंची दोन मंदिरं बघितली -मॅक्लिओडगंज येथे प्राचीन भागसुनाग मंदिर बघितलं -
१
तसं काही न ठरवता सुद्धा आमच्या हिमाचलच्या ट्रीपमध्ये वेगवेगळ्या धर्मांची धार्मिक स्थळं बघण्याचा योग आला. हिंदूंची दोन मंदिरं बघितली -मॅक्लिओडगंज येथे प्राचीन भागसुनाग मंदिर बघितलं -
१
आमची धरमशालाला जाण्यासाठीची जी प्रमुख आकर्षणं होती त्यापैकी एक म्हणजे मॅक्लिओडगंज येथील दलाई लामा मंदिर (नामग्याल मॉनेस्ट्री) बघणे ! याआधी २०१० साली कूर्गजवळील बायलाकुप्पा येथील तिबेटी गोल्डन टेम्पल बघितलं होतं आणि मला ते खूपच आवडलं होतं. तिथे अनुभवलेली शांतता वेगळीच होती. म्हणूनच कधीतरी तिबेटी बौद्ध लोकांचे मुख्य देऊळही मला बघायचं होतं. याच देऊळ परिसरात तिबेटी बौद्धांचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा राहतात. चीनने तिबेटवर १९५९ साली ताबा मिळवल्यावर दलाई लामा परागंदा होऊन भारतात आश्रयासाठी आले. या परागंदा अवस्थेत काय काय होत असेल? self preservation चा विचार न करता देशाच्या नागरिकांचा विचार करून एवढा लढा देणं ही खूपच अवघड गोष्ट आहे. भारताने त्यांना आधी मसुरी आणि नंतर धरमशाला येथे कायमस्वरूपी वास्तव्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. तेव्हापासून ते भारतातच निर्वासित म्हणून राहत आहेत. चीनने तिबेटवरील ताबा सोडण्यासाठी शांततापूर्ण मार्गाने ते इतका प्रदीर्घ काळ आंदोलन करत आहेत. त्यांचा दुर्दम्य आशावाद, चिकाटी आणि चीन सारख्या महाकाय राक्षसासमोर न झुकण्याची दृढता मला अचंबित करते. या अहिंसात्मक मार्गाने प्रश्न सोडवण्याच्या त्यांच्या लढ्यात मला महात्मा गांधी दिसतात (साध्याइतकंच साधनशुचितेला महत्त्व !) आणि म्हणूनही दलाई लामा यांच्या बद्दलचा आदर दुणावतो. खरं तर त्यांना प्रत्यक्ष भेटायलाही आवडलं असतं पण त्याबाबतची प्रक्रिया काय असते हे माहित नसल्याने ते शक्य झालं नाही. परंतु त्यांचं निवासस्थान बाहेरून बघितलं आणि मॉनेस्ट्रीमधील कालचक्र मंदिर आणि बुद्धाच्या देखण्या मूर्ती बघितल्या.
१
आमच्या या आधीच्या बऱ्याच सहली कुठल्यातरी ट्रॅव्हल एजंट अथवा जंगल सफारी आयोजित करणाऱ्या व्यक्ती/कंपनी या मार्फत झाल्या आहेत. ही हिमाचलची सहल मात्र अथ पासून इतिपर्यंत आमची आम्हीच प्लॅन केली. यात विशेष असं काही नाही कारण आजकाल बरेच जण असंच करतात. आमचा हा पहिलाच अनुभव! आम्हांला हे करणं सोपं गेलं कारण माझ्या एक पेशंट हिमाचल प्रदेश मध्येच राहतात. म्हणजे त्या मराठीच आहेत. मूळच्या पुण्याच्याच... अविवाहित..त्यांनी निर्मलादेवींच्या सहजयोग कार्याला वाहून घेतलं आहे. धरमशाला जवळील नद्दी या ठिकाणी (इथे सनसेट पॉईंट आहे ) सहजयोग केंद्र आहे. तिथे त्या राहतात. तिथली हवा खूपच थंड झाली, बर्फ पडू लागला की त्या पुण्याला येतात. इथे काही महिने राहून मग परत तिथे जातात. त्यांच्या इथल्या वास्तव्यात त्या माझ्याकडे औषध घेऊ लागल्या. माझी मुलगी या आधी मनाली आणि कसोलला जाऊन आली आहे आणि तिचा आग्रह होता की आम्ही सुद्धा कसोल बघावं. या माझ्या पेशंटशी मी सहज बोललो की आम्ही हिमाचलला जायचा विचार करत आहोत तर त्यांना इतका आनंद झाला की काही विचारायची सोय नाही ! त्यांनी मग तिथली बघायची ठिकाणं, तिथले काही फोटो/व्हिडिओ , इतकंच काय धरमशाला ते कसोलला जाण्यासाठी बसचे पर्याय, त्यांच्या तिकीट बुकिंगच्या वेबसाईटच्या लिंक्स हे आपणहून शेअर केलं ! एवढं कोण करतं आजकाल ! तेही एका परक्या माणसासाठी ! मी हे असं कोणासाठी केलं असतं का असा विचार माझ्या मनात येऊन गेला आणि खोटं कशाला बोला- त्याचं उत्तर नाही हेच आलं ! या पेशंटच्या निर्मलादेवींच्या परिवारातील एक सदस्य श्री अमितकुमार यांचा नंबरही पेशंटने दिला. त्यांचं धरमशाला जवळ दल लेक (हो...इथेही दल लेक नावाचा...पण अतिशय छोटा आणि हिरवं पाणी असलेला तलाव आहे) येथे एक हॉटेल आहे. तिथे तुम्ही राहू शकता असं त्यांनी सुचवलं. त्याप्रमाणे आम्ही अमितकुमारांशी बोलून, हॉटेलचे फोटो वगैरे पाहून ८ आणि ९ एप्रिल ला तिथे राहायचं ठरवलं. माझ्या पेशंटने मनापासून आणि निरपेक्ष मदत केली म्हणून आमच्या तिथल्या वास्तव्याच्या काळात त्यांना भेटायला त्या सहजयोग केंद्रात गेलो. एकंदरीत आमचा कोणाचाच निर्मलादेवी/सहजयोग/कुंडलिनी या गोष्टींवर विश्वास नाही. तरीही तिथे गेलो.. पेशंटला आम्ही गेल्याचा खूप आनंद झाला. तिथलं निर्मलादेवींचं फोटो प्रदर्शन पेशंटच्या आग्रहाखातर (पण खरं तर उडत उडत ) बघितलं. तिथल्या आणखी काही स्वयंसेवक आम्हांला तिथेच ध्यान धारणेला बसा असा आग्रह करत होत्या.. बोलण्याच्या शैलीवरून त्या दाक्षिणात्य वाटल्या. माझ्या मुलीशी बोलताना त्या अक्षरश: गळेपडूपणा करत होत्या. पण आम्ही काही बधलो नाही आणि तिथून काढता पाय घेतला !
२
१
कुठल्याही पर्यटन सहलीला गेल्यानंतर त्यावर लिहिताना फक्त त्या त्या ठिकाणाचं वर्णन करणं एवढंच अपेक्षित असू नये...अर्थात हे माझं वैयक्तिक मत ! आपण काही फक्त भौगोलिक जागांना बघायला जात नसतो. तिथे गेल्यावर आलेले अनुभव, आपल्या मनात आलेल्या भावना, तिथे दिसलेली/भेटलेली माणसं, त्यांचे विचार, त्यांचे तिथल्या परिस्थितीतले जगणे यावर व्यक्त होणं ही तेवढंच आवश्यक आहे असं मला वाटतं. माझा अनुभव असा आहे की अशा गोष्टी मांडत गेल्यामुळे आपली सहल अधिक संस्मरणीय होते कारण यात आपण छोटे छोटे प्रसंग, बारकावे यांचा विचार करून त्यावर लिहीत असतो. काश्मीर मध्ये आम्ही २०१४ साली गेलो होतो. परंतु तिथे आमच्याबरोबर असलेला आणि ज्याच्याबरोबर आमचा आझाद काश्मीर या विषयावर वाद झालेला आमचा शब्बीर ड्रायव्हर, उडी येथील सैनिकी पोस्ट वर आम्हांला त्यांच्या मृदू आवाजात माहिती देणारे सुभेदार महेंद्रसिंह, श्रीनगरला भेटलेले नगर जिल्हयातले सैनिक संदीप शिंदे किंवा श्रीनगर मधल्या हॉटेलमधील कडक शिस्तीचा वेटर नझीर..हे सगळेच आज इतक्या वर्षांनंतरही स्पष्ट आठवतात! या सगळ्यावर मी काश्मीर डायरी ही मालिका १० भागांत लिहिली आणि मला आजही ती वाचताना त्या आमच्या सहलीला परत घेऊन जाते.. असो.
नमनाला घडाभर तेल खर्च केलं ! आम्ही ८ एप्रिल २०२४ ते १४ एप्रिल २०२४ या काळात हिमाचल प्रदेश मधील धरमशाला आणि कसोल (कसौली नव्हे!) या ठिकाणी गेलो होतो. तिथल्या अनुभवांवर आधारित लिहिण्याचा हा ब्लॉगरूपी प्रयत्न आहे. अर्थात हे लिहिताना मला सांगावंसं वाटतंय की हे माझे अनुभव आहेत. सरसकट सगळ्यांना असेच अनुभव आले असतील असं नाही. माझे अनुभव मांडताना माझी विचारसरणी, माझे पूर्वग्रह इ त्यातून डोकावणार याचीही मला कल्पना आहे. पण लिहिताना माझा हेतू प्रामाणिक आहे...कुठलाही वाद निर्माण करण्याचा माझा हेतू नाही. तरीही माझ्या कडून नकळतपाने कोणी दुखावले गेल्यास क्षमस्व !
२
८ एप्रिल २०२४- हिमाचल प्रदेशला जाण्याआधी पंजाबमधील सुवर्णमंदिरला भेट..
आम्ही पुण्याहून सकाळी १० च्या सुमारास अमृतसरला पोचलो. त्यादिवशी फाल्गुन अमावस्या होती. आम्हांला त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत धरमशालाला पोचायचं होतं. अंतर २०० किमी असलं तरी ४-५ सहज लागणार असा अंदाज होता. आम्हांला तिथपर्यंत सोडणाऱ्या ड्रायव्हरने सांगितलं की आज सुवर्णमंदिरात गर्दी असणार...अमावस्या...सुट्ट्या, बैसाखी... इ मुळे तुमचे सहज ५-६ तास मोडतील म्हणाला! मला हे पटलं नाही. इतका कसा वेळ लागेल?! की आम्ही जाऊच नये म्हणून तो हे म्हणत होता का? आता इथवर आलोच होतो तर मंदिरात जाऊन बघणार होतोच. सुवर्णमंदिर परिसरातल्या चिंचोळ्या गल्ल्यांमधून, तिथल्या बाजारातून वाट काढत मंदिरात पोचलो तर विश्वासच बसेना ! जिथपर्यंत नजर पोचेल तिथवर माणसंच माणसं ! अक्षरश: जन सैलाब ! मला धार्मिक ठिकाणी जाण्याची सवय नसल्याने हे सगळं दृश्य नवीनच होतं. लाखो भाविक आले होते असं म्हणणं अतिशयोक्ती वाटलं तरी ते हजारोंच्या संख्येने नक्कीच होते. लोक प्रवेशद्वारापासून आत कुठेही जागा मिळेल तिथे मथा टेकत होते. सुवर्णमंदिर नेत्रसुखद आहे यात काही शंकाच नाही
मात्र एकच गोष्ट तिथे होती जिच्याशी मी कनेक्ट होऊ शकलो ती म्हणजे तिथे सगळीकडे ऐकू येणारे शबद कीर्तन! स्वच्छ, भारदस्त आवाजात गाणारे कीर्तनकार अशा दमदार पद्धतीने गात होते की वाटावं एखाद्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत हे गायले तर मैफिली जिंकतील! त्यांच्या गाण्यात केवळ गायकी नव्हती तर त्या गायनात भक्ती रस ओथंबून वाहत होता. अशा कीर्तनकारांना रागी म्हणतात असं नुकत्याच वाचलेल्या 'गान गुणगान' या पं सत्यशील देशपांडे यांच्या पुस्तकातून समजलं होतं. त्यामुळे माझ्यासाठी सुवर्णमंदिराला भेट देण्याचं हे एक आकर्षण होतं आणि माझे कान ते गायन ऐकून तृप्त झाले.
३
दोन अडीच तास रांगेत थांबून देखील आम्ही फारसे पुढे सरकलो नव्हतो. त्यामुळे नाईलाजाने आम्ही दर्शन न घेताच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला कारण आम्हांला सहज आणखी चार पाच तास लागले असते आणि आम्हांला त्याच दिवशी धरमशालाला पोचण्याचे वेध लागले होते. सुवर्णमंदिराच्या कळसाचं दर्शन घेऊनच आम्ही निघालो. परतताना सरोवरात अनेक पुरुष स्नान करताना दिसले.
त्यापैकी काही पुरुषांचे कपडे घेऊन, डोक्यावर ओढनी घेतलेल्या, अदबीने उभ्या असलेल्या त्यांच्या बायकाही दिसल्या. त्यापैकी काही पुरुष ज्या हक्काने आणि जवळजवळ सरंजामशाही वृत्तीने त्यांच्या बायकांकडून कामं करून घेत होते ते मात्र बघवत नव्हतं. बाहेर पडून अमृतसरची सुप्रसिद्ध लस्सी पिऊन आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो..
(सर्व फोटो - स्मृती पुसाळकर) (क्रमश:)
२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राममंदिरात रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्या दिवसानिमित्त पुण्यात काय वातावरण होतं याची निरीक्षणं या ब्लॉग मधून नोंदवली आहेत...
(डिस्क्लेमर : शक्य तितक्या वस्तुनिष्ठपणे ही निरीक्षणे नोंदवण्याचा मी प्रयत्न केला आहे. यात कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही. अनावधानाने कोणी दुखावले गेले असल्यास क्षमस्व ! हा केवळ एक फेसबुकीय दस्तावेजीकरणाचा प्रयत्न आहे)
१) २१ जानेवारीच्या रात्री १२ वाजता मला फटाक्यांच्या आवाजाने जाग आली. सुमारे १५-२० मिनिटं फटाक्यांचे आवाज येत होते. यावरून मला वाटलं की २२ जानेवारी जोरात साजरी होणार आणि जागोजागी ट्रॅफिक जॅम होणार, आपण त्यात अडकून पडणार वगैरे...
२) २२ जानेवारीची सकाळ नेहमीप्रमाणेच होती. फक्त सगळीकडे उत्साह होता, लगबग जाणवली. व्हाट्सअँप ग्रुप वर या दिवसाचं औचित्य साधून कोणी कविता केली होती तर कोणी रामाचं गाणं म्हणून ते पोस्ट केलं होतं , कोणी रांगोळी काढली त्याचा फोटो पाठवला होता. रामाच्या प्रति असलेला त्यांचा भक्तिभाव त्यातून उत्सफूर्तपणे प्रकट होत होता.
३) माझं हातावर पोट (!) असल्यामुळे सुट्टी नव्हतीच. ती घ्यायची इच्छाही नव्हती पण वाहतुकीत अडथळे निर्माण झाले तर आपण दवाखान्यात पोचूच शकणार नाही असं वाटलं होतं. पण सुदैवाने तसं काहीच झालं नाही. सकाळ- संध्याकाळ माझ्या आणि दुपारी गावातील (पेठेतील) दवाखान्यांत मी व्यवस्थित जाऊ शकलो. नाही म्हणायला वाटेत सकाळी एक शोभायात्रा लागली. पण ती रस्त्याच्या एका बाजूने जात होती. त्यात बँड होता.. पण स्पीकरच्या मोठाल्या भिंती नव्हत्या. बरेच लोक त्यात सहभागी झाले होते. कोणीही नाचत नव्हते. फक्त एकाच माणूस गणपतीत नाचतात तसं (पण माफक) नाचत होता.
४) दवाखान्यात एका माहेश्वरी समाजाच्या पेशंटने मला (मी सांगितले नसताना देखील ) अयोध्या मंदिराचा फोटो व्हॉट्स ॲप वर पाठवला आणि ते म्हणाले - "कोण म्हणतं की मंदिर अपूर्ण आहे? ते पूर्ण झालं आहे. पहा तुम्हांला फोटोही पाठवला आहे" (खरं तर मी असं काहीच बोललो नव्हतो)पुढे ते म्हणाले - "आज वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे - साठ देशांमध्ये लाईव्ह रिले होणार आहे. टीआरपी चे सर्व रेकॉर्ड मोडले जाणार आहेत"
तर एका पेशंटने सांगितले की त्यांना आदल्या रात्री अयोध्येत बॉम्ब स्फोट झाल्याचे स्वप्न पडले आणि त्यामुळे त्या दचकून जाग्या झाल्या आणि त्यांनी घरातल्या लोकांना टीव्ही लावून तिथे कुठे घातपात तर नाही ना झाला याची खात्री करून घ्यायला सांगितलं !
५) प्रत्यक्ष प्राण प्रतिष्ठापनेच्या मुहूर्तावेळी (मी त्याचं प्रसारण पाहिलं नाही) वेगळं असं काहीच जाणवलं नाही.( म्हणजे फटाके वगैरे) (हे मी माझ्या भागापुरतं सांगू शकतो)
६) येता जाता रस्त्यावर सगळीकडे भगवा माहोल होता- भगव्या पताका, भगवे झेंडे(सायकल, रिक्षा, दुचाकी, अपवादात्मक चारचाकी गाड्यांवर झेंडे लावले होते) घराघरांवर झेंडे दिसत होते. भगवे आकाशकंदील होते. काही घरांवर विद्युत रोषणाई केली होती. सोसायट्यांमध्येच हे जास्त होतं असं नाही तर झोपडपट्ट्यांमध्येही भगव्या पताका, आकाशकंदील दिसत होते. आम्ही जैन नसलो तरी जैन समाज बहुल सोसायटीत राहतो. आमच्या सोसायटीत देखील (२० बिल्डिंगची सोसायटी ) सगळीकडे भगव्या पताका लावल्या होत्या. दिवाळीत केली होती तशीच विद्युत रोषणाई केली होती. मुख्य म्हणजे जैन मंदिराबाहेर मोठी रांगोळी काढली होती. सोसायटीत सकाळी आणि संध्याकाळी महाआरती होती आणि व्हाट्सअँप ग्रुप सांगण्यात आलं होतं की स्त्रियांनी भगव्या साड्या नेसून यावं तर पुरुषांनी पांढरे कपडे घालावेत. त्याप्रमाणे लोकांनी तसं केलं.
७) एखादा गुढी पाडव्याचा सण असावा तसा उत्साह लोकांमध्ये होता आणि तसा भारतीय पारंपरिक पेहराव घातलेले लोक रस्त्यात दिसत होते. भगवे झब्बे, भगव्या टोप्या, काहींचे भगवे स्वेटर, एका चारचाकीच्या पुढच्या आणि मागच्या काचेवर जय श्रीराम असं लिहिलं होतं आणि श्रीरामाचा मोठा फोटो होता. तो गाडी कशी चालवू शकत होता कोणास ठाऊक!
८) जागोजागी भगव्या रंगाचे स्टेज उभारण्यात आले होते आणि त्यावर धनुर्धारी श्रीरामाच्या मूर्ती होत्या आणि तो एक प्रकारचा सेल्फी पॉईंट होता. इथे तरुणांची बऱ्यापैकी गर्दी होती. हा सगळा खर्च कोणी केला असा प्रश्न पडला पण अशा ठिकाणी आजी-माजी नगरसेवक, भावी नगरसेवक-आमदार यांचे फोटो दिसले आणि लगेच त्याचे उत्तरही मिळाले. अशा आजी माजी आणि भावी राजकारण्यांकडून प्रसाद वाटप,कार सेवकांचा सत्कार, डीजे, भावगीत गायनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले.
९) कुटुंबवत्सल श्रीरामाऐवजी सगळीकडे धनुर्धारी श्रीराम दिसत होता- जागोजागच्या फ्लेक्स वर देखील!
फ्लेक्स वरचे मजकूर वाचण्यासारखे होते-
' ५०० वर्षांचा वनवास संपला'
' राजतिलक की करो तैयारी
आ रहे हैं भगवाधारी'
एका फ्लेक्सवर लिहिलेल्या मजकुराचा मला अर्थ कळला नाही -
' अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार '
१०) दिवसभर सगळीकडे रामाची गाणी लावली होती. एखाद्याच ठिकाणी सुधीर फडके-ग दि मा यांच्या गीत रामायणातील गाणी होती. बाकी साकळीकडे तीच तीच गाणी होती. मुख्यतः 'रामजीकी निकाली सवारी' हे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीत दिग्दर्शनातील 'सरगम' मधील गाणी होतं. एकूण श्रीरामावरील catchy गाण्यांची कमतरता जाणवली. एक गाणं मी काल पहिल्यांदाच ऐकलं -
'श्रीराम...जानकी बैठे है मेरे सीने में' हे गाणं १९६८ सालच्या 'मेरे हमदम मेरे दोस्त' सिनेमातील (पुन्हा एकदा लक्ष्मीकांत प्यारेलाल !) 'अल्लाह ये अदा कैसी है इन हसीनो में' च्या चालीवर होतं.
(मूळ गाणं कोणाला ऐकायचं असल्यास-https://youtu.be/Dlaiz7Zp5cQ?si=89C5VU9ixcVPj8y- )
११) सोशल मीडिया वर खूप जणांनी व्हाट्सअँप स्टेटस वर श्रीराम आणि अयोध्या मंदिर हा विषय ठेवला होता. कदाचित सेल्फी वाले फोटो ही टाकले असतील. (एरवी मी स्टेटस ठेवतो आणि बघतो. पण २२ जानेवारीला मी फारसे कोणाचे स्टेटस बघितले नाही . माझ्या रोजच्या शिरस्त्याप्रमाणे मी पक्ष्यांचे फोटो स्टेटस वर ठेवले होते) कोणीतरी ट्विटर (आताचं एक्स ) वर लिहिलं होतं -
२२ तारखेच्या 'द इंडियन एक्सप्रेस' च्या २० पैकी १४ पानांवर श्रीराम हाच विषय होता- त्यात काही संपूर्ण पानं जाहिरातींची, तर काही लेख (ज्यात सरसंघचालक मोहन भागवतांचा लेखही होता) बाकीच्या वर्तमानपत्रांविषयी काय बोलणार !
१२) राममंदिरच्या निमित्ताने सोशल मीडियावरील अनेक मुखवटे गळाले त्यात प्रामुख्याने मला 'एक्स' वरील अमित शांडिल्य यांचा उल्लेख करावासा वाटतो. ते खरं तर चांगलं लिहायचे. पण..
१३) तरुणांचा सहभाग याविषयी लिहिलं आहेच. पण विशेष म्हणजे बऱ्याच तरुणांनी भगव्या रंगाच्या 'जय श्रीराम' च्या टोप्या घातल्या होत्या. इतक्या मोठ्या प्रमाणात टोप्या या आधी मी 'मैं भी अन्ना' च्या बघितल्या होत्या. त्या पांढऱ्या रंगाच्या गांधी टोप्या होत्या. तेव्हा अशा टोप्या घालून फिरणे आणि मोर्चात सहभागी होणे यातून आपण भ्रष्टाचाराविरोधात काहीतरी करत आहोत अशी भावना लोकांमध्ये झाली होती. आता गांधी टोप्याही भगव्या झाल्या ! त्या घालून आता लोकांना वाटतंय की राम मंदिराच्या पवित्र कार्यात आपणही सहभागी झालो आहोत. तेव्हाच्या आंदोलनाने एक सरकार उलथवून टाकले. ..आताचे वातावरण/ मूड बघून हेच सरकार पुनः स्थापित होईल असं निदान २२ तारखेला तरी दिसतंय.
१४) संध्याकाळी लोक फटाके वाजवून आजचा दिवस साजरा करत होते. यात लहान मुलांपासून ते वयस्कर स्त्री- पुरूष उत्साहाने सहभागी झाले होते. व्हाटस् ॲपवर सांगितले होते म्हणून काही घरांबाहेर पणत्या लावलेल्या दिसल्या. उच्चभ्रू लोकांमध्ये उत्साह तर होताच पण आमच्या झाडूवालीचं बोलणं ऐकलं .ती म्हणाली-"आज जादाचं दूध आणलंय. खीर करून खाणार"
१५) २२ तारखेला प्राण प्रतिष्ठापना झाल्यावर मी २३ जानेवारीला हे सगळं लिहीत आहे. काल मायापुरीतल्या सदराच्या शीर्षकासारखं - 'मगर हम चूप रहेंगे' हे धोरण ठेवलं होतं. सोशल मीडियावर मी कुठंही प्रतिक्रिया दिली नाही.अगदी राहुल सोलापूरकरांची धादांत खोटी पोस्ट फिरत असून देखील त्यावर मी काहीच भाष्य केलं नाही. लोकांच्या आनंदावर आपण विरजण का घाला ! कारण हा असा मूडच होता की इथे कुठलाही प्रतिवाद करणं/ विरोधी मुद्दा मांडणं अवघडच नाही, अशक्य होतं. अगदी प्रतिवाद केलाही असता तर माझ्या सारख्याची मतं अल्पमतातच राहिली असती आणि कालचा दिवस असा होता की माझी मतं wouldn't have mattered at all!यावर कोणाला मी पुचाट/पळपुटा / आपल्या मतांवर ठाम न राहणारा वाटू शकतो. पण आता खरं सांगायचं तर एक प्रकारची दमछाक जाणवत आहे. आपण एकटे विरुद्ध सगळे हे आता झेपत नाही. असा एक बहुसंख्यवाद रुजला आहे की ज्यात अल्पमताची किंमत नगण्य अथवा शून्यच आहे असं दिसतंय . आपण वा आपली मतं irrelevant आहोत असं लक्षात आल्यावर आपण बोलूच नये आणि जे जे होत आहे ते मूकपणे पाहत राहावे या निष्कर्षावर मी आलो.
१
मागच्या ब्लॉगमध्ये आर डी आणि लता यांच्या गाण्यातील मेलडी हा विषय घेऊन त्यावरील गाण्यांविषयी लिहिलं होतं. यावेळीही मेलडीवर लिहीनच परंतु पुढील गाण्यांतील मला उमजलेल्या भाव-भावनांविषयी देखील लिहिणार आहे. आर डी बर्मन यांच्या संगीतावर अनेक आक्षेप घेतले जातात. वेगवेगळे रिदम पॅटर्न, वेगवेगळे साउंड्स यांच्या प्रायोगिक वापराच्या नादात त्यांच्या गाण्यांतील भाव मागे पडतात हा त्या आक्षेपांपैकी एक असावा ! कदाचित या ब्लॉगमधून त्यावर देखील लिहायचा प्रयत्न करणार आहे. मागील ब्लॉग प्रमाणेच या ब्लॉग मध्ये देखील केवळ सोलो गाण्यांचाच विचार केला आहे . (कदाचित डुएटस साठी एक वेगळा ब्लॉग लिहीन याची ही प्रस्तावना आहे असं वाचकांना वाटू शकेल ! आत्ताच्या घडीला त्याबद्दल सांगता येणार नाही पण आर- डी -लता मंगेशकर डुएटस हा खरोखरच एका वेगळ्या ब्लॉगचा विषय आहे हे नक्की . )
२
१) आजा पिया तोहे प्यार दू - बहारों के सपने (१९६७) -
https://youtu.be/T1FcSe-J2HQ?si=I39eBq6gIHNFgH3B
या गाण्याच्या सुरुवातीच्या चार ओळी लता मंगेशकरांच्या मृदू आवाजात, कोणत्याही वाद्यांशिवाय आहेत. गाणं तसं नायकाला address करणारं आहे. म्हणून कदाचित त्यात छोटे छोटे फ्रेजेस आहेत - आजा पिया / तोहे प्यार दू/ गोरी बैय्या/ तोपे वार दू ... यात 'गोरी बैय्या' नंतर किंवा 'किस लिये तू' नंतरचा सूक्ष्म ठहराव लक्षवेधी आहे. कथानकात नायक राम (राजेश खन्ना ) परिस्थितीशी झुंज देता देता एका क्षणी पराभूत मनोवस्थेत असताना नायिका /त्याची प्रेमिका गीता (आशा पारेख ) त्याच्यासाठी हे गाणं गात आहे असा प्रसंग असावा. तिला तिच्या प्रेमाविषयी एवढा विश्वास आहे की तिला वाटतंय की त्या जोरावर रामला त्या परिस्थितीशी लढण्याचं बळ मिळेल. संपूर्ण गाण्याच्या शब्दांत एक सकारात्मकता आहे, आशा आहे आणि एक भावनिक आवाहन आहे. गाण्याचा हा मूड लता मंगेशकर यांनी सुरवातीपासूनच सुरेख पकडला आहे. 'गोरी बैय्या तोपे वार दू' 'थके हुए इन हाथों को दे दे मेरे हाथ में ' यातून शरीर स्पर्शाचेही आवाहन आहे(healing touch या अर्थाने ) पण ते आर्जव आहे आणि त्यात कुठेही आव्हान नाही. हा प्रसंग आणि त्यासाठीचे मजरुहसाहेबांचे शब्द योग्यरीत्या समजून उमजून ही चाल हा समतोल साधते. स्पर्शातून इथे प्रोत्साहन अभिप्रेत आहे - 'अवघड कठीण काळ असला तरीही यावर तू मात करू शकशील' 'तुझा मार्ग खडतर आहे हे मलाही कळतंय पण या मार्गावर तुझ्याबरोबर मीही तुझी साथ सदैव करत आहे..' ही उमेद जागवणारं प्रोत्साहन ! म्हणूनच या गाण्यासाठी लता मंगेशकरांची निवड योग्य ठरते. या संपूर्ण गाण्यात गिटार आणि बासरी लता मंगेशकर यांच्या जवळपास बरोबरीने साथ करतात - जणू काही त्या शाश्वत प्रेम आणि विश्वासाचंच प्रतीक असाव्यात ! जोडीला संतूर आणि सॅक्सोफोन देखील समर्थ आणि समर्पक आहेत. पण कुठलेही वाद्य लता मंगेशकर यांच्यावर कुरघोडी करत नाही. म्हणूनच हे सॉफ्ट आणि रोमँटिक गाणं श्रवणीय वाटतं .
२) क्या जानू सजन होती है क्या गम की शाम - बहारों के सपने (१९६७) -
https://youtu.be/Sd0sHdeVkMA?si=_rzR92Rh4QxZbPti
'बहारों के सपने' हा एक कृष्ण धवल सिनेमा आहे परंतु या सिनेमातील हे एकमेव गाणं रंगीत आहे कारण हे एक स्वप्नगीत आहे आणि आपली स्वप्नं रंगीबेरंगीच असतात ! पण या गाण्यात आर डी ने एक अभिनव प्रयोग केला आहे. यात मी फार काही नवीन सांगतोय अशातला भाग नाही - यात भारतातला कदाचित पहिला व्हॉइस-ओव्हर- व्हॉइस हा प्रयोग करण्यात आला आहे. हा प्रयोग तेव्हा नवीन असल्यामुळे लोकांना या गाण्यातला दुसरा आवाजही लता मंगेशकरांचा आहे यावर विश्वास बसायचा नाही. काहींना तर हा आवाज उषा मंगेशकरांचा वाटला होता ! पण हा असा प्रयोग का केला असावा ? खरं तर हिंदी सिनेमांत स्वप्नगीतांची एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. (आठवा- 'आवारा' मधील 'घर आया मेरा परदेसी', 'प्यासा' मधील 'हम आपकी आँखों में' 'गुमनाम' मधील 'हम काले है तो क्या हुआ दिलवाले है' इ) या गाण्यांत नेत्रदीपक आणि भव्यदिव्य सेटस, तो टिपिकल पांढरा धूर वगैरे बघायला मिळतो. आर डी च्या 'क्या जानू सजन' ने हा ठराविक साचा न स्वीकारता त्यात बदल केला. स्वप्नं म्हणजे कल्पनांची भरारीच असते. जर ती रंगीबेरंगी असू शकतात तर त्यात हे असे overlapping आवाज का असू नयेत? ध्वनी-प्रतिध्वनीचा हा खेळ स्वप्नात जास्त उठून दिसेल या विचाराने हा वेगळा परिणाम गाण्यात वापरण्यात आला असावा. स्वप्नगीत असल्यामुळे गाण्याच्या सुरुवातीला एक गूढरम्य वातावरणनिर्मिती आहे- लता मंगेशकरांचा आलाप आणि त्या जोडीला गिटार आणि व्हायोलिनचा वापर यातून ते साधलं आहे. वरील गाण्याप्रमाणे याही गाण्यात गिटार आणि बासरी यांची सातत्याने साथ आहे शिवाय जोडीला स्ट्रिंग सेक्शन (व्हायोलिन) जबरदस्त आहे. कडव्यातील पहिली ओळ दोनदा आहे. ती ओळ दुसऱ्यांदा सुरु होण्याअगोदर गिटारचा छोटा तुकडा केवळ अप्रतिम! पहिली ओळ दुसऱ्यांदा म्हणताना व्हॉइस -ओव्हर- व्हॉइसचा वापर आहे आणि हे दोन्ही कडव्यांच्या वेळी आहे. गाण्याचा मूड जेवढा आर डी -लता यांना पकडता आला आहे, तेवढा तो चित्रीकरणात (सुप्रसिद्ध जाल मिस्त्री असूनही !) आणि दिग्दर्शनात(नासीर हुसैन) यांना जमला नाही असं मला वाटतं.
३) ना कोई उमंग है ना कोई तरंग है - कटी पतंग (१९७१)-
https://youtu.be/HlB9ogpEk8w?si=vKQem7KEz9EF7aZ1
गुलशन नंदा यांच्या कादंबरीवर आधारित 'कटी पतंग' या सिनेमात योगायोग आणि चमत्कारिक परिस्थिती यांची अगदी रेलचेल होती. नायिका पूनम/मधू हिला ती विधवा नसताना विचित्र परिस्थितीमुळे विधवा वेशात राहावं लागतं आणि त्यातच नायक कमल (राजेश खन्ना ) तिच्याकडे आकर्षित होतो ('मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिये जाये'... ) तिची सत्य परिस्थिती तिला सांगता येत नाही परंतु नायकाचं तिच्याकडे आकर्षित होणं तिच्या लक्षात आलं आहे (कदाचित तिला ते आवडूही लागलं आहे?) अशा कात्रीत सापडलेल्या प्रसंगी सिनेमात हे गाणं आहे. आनंद बक्षी यांनी तिच्या व्यथेचं वर्णन करणारे यथोचित शब्द लिहिले आहेत. एरवी आपण जे गाणं ऐकतो त्यावरून गाण्याच्या सुरुवातीचं संगीत अर्धवट वाटतं. मात्र वर लिंक आहे त्यात सुरवातीचं संपूर्ण संगीत आहे. त्यातील स्ट्रिंग सेक्शन च्या प्रभावी वादनातून जणू पतंग कापला गेल्याचा आणि तो भरकटत गेल्याचा भास होतो. पहिल्या कडव्यातील पहिली ओळ लता मंगेशकरांनी सलग म्हटली आहे- 'आकाश से गिरी मैं एक बार कटके ऐसे'. यातूनही हाच परिस्थितीपुढे आयुष्याचा पतंग भरकटत गेल्याचाच भाव प्रकट होतो. संपूर्ण गाण्यात पॅथॉस भरून राहिला आहे. (म्हणूनच कदाचित नटभैरव या गंभीर प्रकृतीच्या रागाची छाया या गाण्यावर आहे ) हा पॅथॉस रिदम मधूनही जाणवतो. आपल्याला रेसो रेसो आणि तबल्याबरोबरच बॉन्गो सारख्या वाद्याचा आघातही सतत ऐकू येतो. तबला आणि हा बॉन्गो मिळून तालाचं आवर्तन पूर्ण होतं आणि यातही ठेहराव सातत्याने असल्यामुळे दुःखाची किनार गहिरी होते. सुरुवातीलाच व्हायोलिनचा तुकडा संपल्यानंतर पियानो आणि गिटारचा एक छोटासाच तुकडा लाजवाब आहे. 'लगके गलेसे अपने बाबूलके मैं ना रोई' या नंतरचा लता मंगेशकरांचा आलाप अंगावर अक्षरश: काटा आणतो. तसंच यानंतरच्या कडव्याआधी व्हायोलिनचा एक सोलो तुकडा आहे तोही वातावरणनिर्मितीसाठी पूरकच आहे. गाण्यातील इंटरल्यूड संगीत खूप मोठं नाही कारण नायिकेला मनात साचलेल्या भावनांचा कल्लोळ व्यक्त करायचा आहे. संपूर्ण गाण्यात बासरी पुन्हा एकदा खूपच परिणामकारक आहे. विशेषतः 'पतझड की मैं हू छाया' किंवा' डोली उठी यु जैसे' या ओळींनंतर अक्षरश: काही सेकंदच बासरी वाजते पण ती खूप काही सांगून जाते. 'कटी पतंग' सिनेमात लता मंगेशकर यांचं हे एकच सोलो गीत आहे. किशोरकुमारच्या या सिनेमातल्या झंझावातापुढे देखील हे गाणं त्याच्या या वैशिष्टयांमुळे झाकोळलं जात नाही. उलट आपलं अढळ स्थान राखून एक संस्मरणीय गाणं ठरतं.
४) जाने क्या बात है -सनी (१९८४) -
https://www.youtube.com/watch?v=iOkUl3x5ApQ (या लिंक मध्ये पूर्ण गाणं आहे ,तीन कडव्यांसह )
https://www.youtube.com/watch?v=FQYcjNxfsoc (हा या गाण्याचा व्हिडिओ आहे. पण यात दोनच कडवी आहेत )
या गाण्याविषयी लिहिण्यापूर्वी काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात-
अ) 'सनी' हा १९८४ सालचा सिनेमा आहे. हिंदी सिनेमांत सत्तरच्या दशकात (विशेषतः उत्तरार्धात) कथानकांत खूप बदल झाले आणि त्यामुळे देमार पट/ मारधाड असलेले सिनेमे येऊ लागले आणि त्यांची चलती होऊ लागली. अशा सिनेमांच्या भाऊगर्दीत सिनेमांतील गाणी/ त्यांची सुमधुरता लोप पावू लागली. या पार्श्वभूमीवर 'सनी' या चित्रपटातील गाण्यांकडे बघितलं पाहिजे. मग लक्षात येतं की यातली गाणी त्यावेळच्या लाऊडनेसच्या तुलनेत एक ठळक अपवाद होती आणि याला कारण म्हणजे या सिनेमाचे दिग्दर्शक राज खोसला होते (ज्यांनी गुरुदत्त/ देव आनंद सारख्यांबरोबर काम केलं होतं)
आ) या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी लता मंगेशकरांचं वय ५४-५५ वर्षं असावं!
कुठल्याही तारूण्यात पदार्पण केलेल्या मुलीमधील सहज स्वाभाविक भावना या गाण्यात व्यक्त झाल्या आहेत. त्यात प्रियकराची असोशी आहे, त्याची वाट बघणं आहे...झोप न येणं आहे आणि प्रेमाच्या नात्याचं लग्नात रूपांतर करायची ओढही! याही गाण्यात एक ठेहराव आहे आणि 'जाने क्या बात है' नंतर एक लक्षात येण्याजोगा पॉज आहे. त्यानंतर थोडं off beat गाणं पुढे जातं. लता मंगेशकरांनी गाण्यात मींडकाम काय सुरेख केलं आहे. असं वाटावं की स्वरांच्या हिंदोळ्यावर एक नवथर तरूणी मस्तपैकी झुलतेय! मला यातच एक अल्लड निरागसताही दिसते. प्रत्यक्ष गाण्यातला ताल आणि इंटरल्यूड मधील ताल यात लयीत फरक आहे जो अर्थातच गाण्याच्या प्रसंगानुरूप आहे. गाण्यात इलेक्ट्रिक गिटारचा वापर छान आहे त्याचबरोबर सतार- सरोद आणि तिसऱ्या कडव्या आधी (पुढे गाण्यात शहनाईचा उल्लेख आहे म्हणून) तार शहनाईचा वापरही आहे. (या गाण्यातील गिटार संबंधी मला माझा शालेय मित्र आणि संगीत/आर डी प्रेमी श्रीपाद गांधी याची मदत झाली)
या गाण्यांशिवाय आर डी- लता मंगेशकर यांची आणखीही काही सोलो गाणी आहेत (शिवाय डुएटस् आहेतच!) त्यावर पुन्हा कधीतरी लिहीनच!!
१
सुलभाताई तेरणीकर |
हिंदी सिनेमा आणि विशेषतः सिनेसंगीताची आवड असणाऱ्या मराठी वाचकांना सुलभाताई तेरणीकर हे नाव निश्चितच माहीत असतं. विशेषतः पुण्यात या विषयावर झालेल्या कार्यक्रमांत त्यांचे रोचक भाषण झालेले असते, त्यांनी अशा कितीतरी कार्यक्रमांसाठी संहिता लिहिलेली असते. अशा कार्यक्रमांचे वृत्तांत वर्तमानपत्रांत येत असतात. त्यातूनही आपल्याला त्यांचा परिचय झालेला असतो. 'दैनिक सकाळ' आणि 'महाराष्ट्र टाइम्स' मधली त्यांची सदरं वाचून आपल्याला त्यांच्या चौफेर वाचनाचं ,गाढ्या अभ्यासाचं ,सकारात्मक जीवनदृष्टीचं ,रसिकतेचं ,सौंदर्यपूर्ण, सुसंस्कृत लेखनशैलीचं आणि उच्च अभिरुचीचं दर्शन घडलेलं असतं. त्यामुळेच त्यांना प्रत्यक्ष न भेटता देखील आपल्याला त्या सुपरिचित असतात आणि आपले त्यांच्याशी एक आदराचे नाते नकळत तयार झालेले असते. आपण जर त्यांनी लिहिलेली पुस्तकं वाचली असतील तर आपण आणखी स्तिमित होतो. मी सुप्रसिद्ध गायक अरुण दाते यांचे त्यांच्या सांगीतिक वाटचालीवर आधारित 'शुक्रतारा' हे पुस्तक वाचले. |
२
सुलभाताई तेरणीकरांना भेटावे, निदान त्यांच्याशी पत्राद्वारे संपर्क साधावा असे मला 'म टा' मधील त्यांचे रागदारीवरील सदर वाचून खूपदा वाटले होते. याचं कारण म्हणजे या सदरातून त्यांनी केवळ शास्त्रीय संगीतच नव्हे तर त्यावर आधारित हिंदी-मराठी गाण्यांचा सुंदर मागोवा घेतला होता. त्यातलंच एक उदाहरण दिल्याशिवाय मला राहवत नाही -
' चित्रपटसंगीतातला खमाज पैंजणपावलांनी येणारा, मुग्ध प्रणयानं भारलेला आहे. संगीतकार मदन-
मोहननी दोन सुंदर गाणी लतादीदींकडून गाऊन घेतली. पूजा के फूलमधलं मेरी ऑँखोंसे कोई नींद लिये
जाता है आणि रिश्ते नातेमधलं खनक गयो हाय बैरी कंगना. खमाजची प्रकृती चंचल आहे असं
जाणकार सांगतात. पण संगीतकार या चंचल रागाला प्रणयिनीच्या अधीर हृदयाशी सुरांनी बांधतो आणि
मग खमाज रागाची रूपमोहिनी या गाण्यातून मनात पसरते.
मदन-मोहननी राग खमाजचं एक सुंदर रूप इक हसीन शाम को दिल मेरा खो गयाला बहाल केलं आहे.
एका सुंदर संध्याकाळी आपण हृदय हरवून बसलो हा भाव खमाज रागाच्या कोणत्या स्वररचनात
गुंफलेला हे सांगता येणार नाही, पण उदास, हुरहूर लावणाऱ्या संध्याकालाच्या प्रतिमेला त्यानं हलकेच दूर
सारलं आहे.'
या एका परिच्छेदातून लेखिकेच्या अफाट सौंदर्यदृष्टीचा अंदाज आपल्याला येतो.
मला जरी त्यांना भेटावंसं वाटत होतं तरी ते कसं करता येईल याबद्दल माझ्याकडे काहीच माहिती नव्हती. किंवा कोणीही परिचित नव्हते जे मला आणि त्यांना ओळखत होते. नंतर मात्र एका अतिशय अपूर्व योगायोगामुळे माझा आणि सुलभाताईंचा परिचय झाला. हे घडलं सध्याच्या व्हर्चुअल जगामुळे ! म्हणजेच व्हाट्सअँप मुळे !आणि याचे संपूर्ण श्रेय जातं आमच्या या संगीत विषयक ग्रुप्सचे ऍडमिन श्री. विवेक पाध्ये यांना! मी ज्या संगीत विषयक समूहांमध्ये होतो तिथे सुलभाताई तेरणीकर याही जोडल्या गेल्या आणि व्हाट्सअँप just came alive!
३
सुलभाताईंना सिनेसंगीताचा विश्वकोश का म्हणतात हे त्यांच्या समूहावरील अभ्यासपूर्ण पोस्टवरून लगेचच लक्षात आलं. पण यात वेगळेपण हे जाणवलं की त्यांच्याकडे केवळ माहितीचा खजिना नाही तर त्यामागे विचारांचं एक अधिष्ठान आहे. त्या कलाकाराची कलाकृती बघतात आणि त्यावर रसग्रहण करतात. त्या कलाकाराच्या वैयक्तिक, खाजगी आयुष्याबद्दल कधीही बोलत नाहीत. दुसरं म्हणजे त्यांना कोणत्याही कलाकृतीमधील (मग ते एखादं गाणं असो वा सिनेमा ) सौंदर्यस्थळं कोणती हे बरोबर माहीत असतं. आणि तिसरा तेवढाच महत्त्वाचा भाग म्हणजे अतिशय मोजक्या आणि अचूक शब्दांत त्या याविषयी मांडणी करतात. त्यांच्या लिखाणात कुठेही फाफटपसारा नसतो. त्यांचं भाषिक सौंदर्य सहजसुंदर आणि अफाट आहे. त्यात कुठलाही कृत्रिमपणा नाही. आम्हांला शाळेत असताना इंग्रजी विषयात precis writing हा एक भाग होता. दिलेल्या परिच्छेदाचे सर्व महत्त्वपूर्ण मुद्दे थोडक्यात मांडणे त्यात अपेक्षित होते. ते मला कधी जमलं नाही. पण सुलभाताईंच्या पोस्ट वाचल्यावर नेमकं लिखाण म्हणजे काय असतं याचा वस्तुपाठच मिळाला ! सुलभाताईंबद्दल आणखी एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे त्या कायमच accessible /approachable आहेत. आपण सेलिब्रिटी आहोत, सुप्रसिद्ध लेखिका आहोत याचा कोणताही बडेजाव/तोरा त्या मिरवत नाहीत. त्यांना इतक्या वेगवेगळ्या विषयांमध्ये रुची आणि गती आहे की याची तुलना फक्त दुर्गाबाई भागवत यांच्या अफाट व्यासंगाशी करता येईल! एकूणच संगीत क्षेत्र सोडल्यास फुलं/झाडं/निसर्गसौंदर्य इथपासून ते कविता/साहित्यापासून ते अगदी पाककला अशा सर्व विषयांवर त्यांचे मार्मिक विचार असतात. आणि या चर्चा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात होतात. सुलभाताईंना विनोदाचे अजिबात वावडे नाही उलट त्या कित्येकांची छान फिरकीही घेत असतात.
४
यथावकाश सुलभाताई आणि त्यांच्या 'Beyond Entertainment' या संस्थेच्या वंदना कुलकर्णी, उस्मान शेख आणि अनघा कोऱ्हाळकर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री विवेक पाध्ये व्यवस्थापक असलेल्या राजलक्ष्मी सभागृह (कोथरूड ) येथे हिंदी सिनेसंगीतावर आधारित दृक श्राव्य कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा योग आला आणि या निमित्ताने सुलभाताईंना प्रत्यक्षही अनेक वेळा भेटता आले. हिंदी सिनेसंगीताच्या सुवर्ण काळाविषयी वेगवेगळ्या थीम्स घेऊन केलेले हे सर्व कार्यक्रम अविस्मरणीय होते. सुलभाताई यात त्या त्या थीमप्रमाणे त्या त्या गाण्यांवर/ संगीतकारावर त्यांच्या नेहमीच्या शैलीत बोलतात आणि ही मूळ गाणी आपल्याला ऐकवली/दाखवली जातात. असं या कार्यक्रमांचं सर्वसाधारण स्वरूप आहे. अशा कार्यक्रमांमधून सुलभाताईंचे या सुवर्णकाळाविषयीचे विचार सविस्तरपणे ऐकायला मिळतात आणि त्यांचा प्रेक्षकांशी अनौपचारिक संवाद हा एक वेगळाच आनंद देऊन जातो. या कार्यक्रमांतून जाणवलं की त्यांना संगीतकार जयदेव, अनिल विश्वास, सी रामचंद्र यांच्या सांगीतिक समज आणि कारकिर्दीविषयी विशेष ममत्व आहे आणि त्यावर विचार करता खरोखरच लक्षात आलं की या तिघांचंही संगीत माधुर्यपूर्ण आणि पथदर्शी होतं. लता मंगेशकर हा सुलभाताईंचा हळवा कोपरा! केवळ एक गायिका म्हणूनच नव्हे तर त्यांना लता मंगेशकर यांचा ३० वर्षांहून अधिक काळ प्रत्यक्ष सहवासही लाभला आहे. आमच्या दैवत असलेल्या लता मंगेशकरांना प्रत्यक्ष भेटलेल्या सुलभाताई म्हणजे आमच्यासाठी पंढरीची वारी अनेक वेळा केलेल्या वारकरीच जणू! म्हणूनच लता मंगेशकर यांच्यावर सध्याच्या काळात पुस्तक लिहिण्याचा जर कोणाला अधिकार असेल तर माझ्यामते तो केवळ सुलभाताईंना आहे आणि त्या लता मंगेशकरांच्या देदिप्यमान सांगीतिक कारकिर्दीला पूर्ण न्याय देतील याविषयी मला पूर्ण खात्री आहे. त्यामुळे मी या ब्लॉगच्या निमित्ताने सुलभाताईंना लता मंगेशकरांवर एक पुस्तक लिहावं अशी विनंती करत आहे.
५
ही खात्री असण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे सुलभाताईंचं 'चंदेरी आठवणी' हे पुस्तक! जानेवारी ते डिसेंबर १९९८ या काळात 'दैनिक सकाळ'च्या कलारंजन पुरवणीमध्ये सुलभाताईंनी याच नावाचं सदर लिहिलं होतं, त्यावर आधारित हे पुस्तक आहे. हिंदी सिने-संगीताच्या जुन्या काळातल्या कलाकारांना प्रत्यक्ष भेटून, त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या गतस्मृतींना उजाळा देणारं हे सदर लोकप्रिय झालं आणि त्यावरील पुस्तक देखील! पण या सदर/पुस्तकामागे सुलभाताईंचे कष्ट लक्षात घेतले तर असं वाटतं की तो संपूर्ण काळ म्हणजे त्यांच्यासाठी एक ध्यासच होता ! १९९८ चा काळ म्हणजे-ना मोबाईल ना कम्प्युटर ! पुण्याहून मुलाखती घेण्यासाठी मुंबईला जायचं
-आणि तेव्हा प्रवासाची साधनंही कमीच होती. या कलाकारांचे नंबर /पत्ते मिळवायचे/शोधायचे...ऊन-वारा-पाऊस यांची तमा न बाळगता त्यांच्या घरी जाऊन मुलाखती घ्यायच्या... आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मुलाखती रेकॉर्डही केल्या जात नव्हत्या. त्यामुळे केवळ मेंटल नोट्स वर आधारित मुलाखती लक्षात ठेऊन पुण्याला येऊन त्यावर संस्करण करून ते वेळेत प्रकाशित करायचं... आणि लगेच पुढच्या कलाकाराच्या मुलाखतीची तयारी करण्यासाठी नॅशनल फिल्म आर्काइव्जच्या ग्रंथालयात जाऊन अभ्यास करायचा! हे सगळं घरच्या जबाबदाऱ्या आणि नोकरी सांभाळून! मनात ध्यास असल्याशिवाय हे होणे शक्य नाही! मुलाखत घेतलेल्या कलाकारांची यादी अक्षरश: डोळे दिपवणारी आहे- अभिनेत्री श्यामा पासून संगीतकार ओ पी नय्यर ते गायिका सुमन कल्याणपूर, सुलोचना पासून मजरूह सुलतानपुरी ते शोभना समर्थ यांच्यापर्यंत .... या सर्व लोकांना बोलतं करून त्यांच्याकडून या सुवर्ण काळाची माहिती /आठवणी आपल्यापर्यंत पोचवून सुलभाताईंनी एक महत्त्वाचे दस्तावेजीकरण केलं आहे.
६
एक ऑक्टोबर २०२३ रोजी सुलभाताई वयाची ७४ वर्षे पूर्ण करून पंचाहत्तरीत पदार्पण करत आहेत.विलक्षण योगायोगाची गोष्ट म्हणजे एक ऑक्टोबर हा जागतिक संगीत दिवस म्हणूनही साजरा करण्यात येतो. शिवाय याच दिवशी ज्येष्ठ संगीतकार सचिन देव बर्मन तसंच गीतकार आणि शायर मजरूह सुलतानपुरी आणि मराठी भावगीतात आपले अढळ स्थान असलेले कवी ग दि माडगूळकर यांचाही जन्म झाला. सुलभाताईंना माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नमस्कार! त्यांचे आयुष्य समाधानाचे आणि आरोग्यदायी जावो आणि त्यांच्याकडून या हिंदी-मराठी संगीत क्षेत्रांविषयी असेच मोलाचे कार्य घडो यासाठीही शुभेच्छा!
एखाद्या ठिकाणी जात राहिल्यावर आपल्याला त्या जागेची सवय होऊन जाते. तशी मला या विठ्ठलवाडी मंदिर परिसराची सवय झाली. एखाद्या रविवारी तिथे सायकलने गेलो नाही तरी टू व्हीलर ने जाऊन घुबडांचे का असेना फोटो काढावे असं वाटू लागलं. जणू मला त्या जागेची ओढच निर्माण झाली. तिथला अर्ध्या तासाचा वेळ...उन्हात असो वा सावलीत..हवाहवासा वाटू लागला. पक्षी शोधणे, त्यांना बघून फोटो काढणे हा एक सरावाचा भाग झाला आणि दोन्हीमध्ये गुणात्मक(!) फरक दिसून येऊ लागला... रोजरोज तीच ती माणसं दिसायची... त्यांचेही तेच ठराविक रुटीन! सगळं कसं अगदी तसाच्या तसं ! थोडंही इकडे तिकडे नाही ! शिवाय मला वेगवेगळे पक्षीही दिसत होते...अगदी महाराष्ट्राचा राज्य पक्षी- हरियाल (Yellow footed green pigeon) ही दिसला. त्यामुळे एकंदरीत सगळं काही सुखाने चाललं होतं.....
मग एकदम काय झालं काय माहित ! इथले पक्षी अचानक कमी झाले . अवकाळी पावसामुळे नदीचं पाणी वाढून ते प्रवाही झाल्यामुळे की काय माहित नाही! पाण्यात जलपर्णी पण आहेच..त्यामुळे पाण्याची जागा जलपर्णीच्या व्यापली.. कदाचित या दोन्हीमुळे पक्ष्यांचं खाद्य कमी झालं की काय माहित नाही ..पण पक्षी कमी झाले एवढं खरं. आता Ibises, Gray Heron, Black winged Stilts, Purple Heron, Open Stork, Golden oriole, Pied Bushchat, long tailed Shrike इ पक्षी गायब झाले आहेत. एवढंच काय जवळच्या वडाच्या झाडावर कित्येक दिवस न चुकता दर्शन देणारं पिंगळा ( Spotted Owlet) या पक्ष्याचं कुटुंबही दिसेनासं झालं. पक्ष्यांचं एक वेळ समजू शकतो पण जी नियमितपणे दिसणारी माणसं होती, तीही गायब झाली ! उन्हाळ्याच्या सुट्ट्या मुलांना असतात पण या इथल्या लोकांना कसल्या आल्यात सुट्ट्या! पक्षी नाहीत... ती माणसं नाहीत... त्यामुळे एरवी आवडीची जागा सुद्धा उदास, भकास वाटू लागली.. वाटू लागलं -आता इथे येणं आपण थांबवावं का ? पण मन मानायला तयार होईना...
Black Kite |
Drongo |
Pond Heron |
Chick of Red wattled Lapwing |